नियमानुसार काम जमत नसेल तर राजीनामे देऊन घरी जा! तुकाराम मुंढे एफडीएच्या २९ कर्मचार्‍यांना इशारा

Foto
मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तथा आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या विरोधात तक्रार करणार्‍या २९ अधिकारी आणि कर्मचार्‍यांना थेट इशारा दिला आहे. ज्यांना शासनाच्या नियमांनुसार काम करायचे नसेल त्यांनी राजीनामा देऊन निघून जावे, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सुनावले. त्यामुळे एफ अँड डी मधील कामकाजाच्या पद्धतीवरून सुरू झालेला वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेतील २९ अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीबाबत खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे तक्रार केली आहे. १५ जुलै रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय, शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम करण्याचे आदेश, रिक्त पदांमुळे वाढलेला कामाचा ताण तसेच त्यामुळे नमुन्यांच्या तपासणीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या निवेदनावर संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या सह्याही आहेत.

या तक्रारीनंतर तुकाराम मुंढे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत कर्मचार्‍यांच्या आक्षेपांना उत्तर दिले. तुकाराम मुंढे म्हणाले, छत्रपती संभाजीनगरमधील कर्मचार्‍यांनी माझ्या विरोधात मंत्री महोदयांकडे तक्रार केली की सुट्टी दिली जात नाही, अनेक तास काम करावं लागतं. त्यांची पहिली मागणी आहे की, त्यांना इतर कार्यालयांप्रमाणे १०-६ ट्रिटमेंट द्यावी. मुळात लॅब हे कार्यालय नाही. लॅबची सेवा ही २४ तास चालणारी संस्था असते. इतर शासकीय कार्यालयात वेळ फिक्स असते पण लॅबमध्ये तसं नसते. लॅब ही २४ तास चालू ठेवायची असते, ८ तास नाही. पण याचा अर्थ असा नाही की, कर्मचार्‍यांनी २४ तास काम करावं. त्यांना ८ तासच काम आपण लावतो, फक्त ते शिफ्टमध्ये आहे. 

...तर राजीनामे देऊन घरी जा : तुकाराम मुंढे
प्रत्येकजण एकच शिफ्ट करणार, दिवसात दोन शिफ्ट नाही. आठवड्यात ४८ तासांच्या वर आपण त्यांना काम लावत नाही, खङज च्या नियमांच्या वर कुणीही त्यांना काम देत नाही. एक दिवस सार्वजनिक सुट्टी आपण देतो. अजून आपण २४ तास ७ दिवस काम सुरू केलेले नाही. आता फक्त दोन शिफ्टमध्ये सहा दिवस काम सुरू केले आहे. गरज पडली तर २४ ताससुद्धा आपण लॅब सुरू करावी लागेल आणि पुढच्या काही दिवसांत ते सुरू होईलच. खासगी लॅब आणि सरकारी लॅब २४ तास चालतात. ज्या कर्मचार्‍यांनी माझ्या विरोधात तक्रार केली त्यांची पहिली मागणी अत्यंत चुकीची आहे, त्यामुळे ती पूर्ण होऊ शकत नाही. १० ते ६ या वेळेत त्यांना ऑफिस देऊ शकत नाही. आठवड्यात त्यांना एक सुट्टी आम्ही देतोय. त्यामुळे त्यांचा जर काही गैरसमज झाला असेल तर तो पुढच्या काळात दूर करू. आता तिथे व्यवस्थित काम सुरू आहे. त्यांना सांगितलं आहे की, या पद्धतीने काम होणे अपेक्षित आहे. ज्यांना शासन नियमांनुसार काम करायचं नाही ते राजीनामा देऊन निघून जाऊ शकतात, (दे आर फ्री टू रिजाईन अ‍ॅण्ड गो), असे त्यांनी म्हटले आहे.  

सोशल मीडियावर चर्चांना उधाण
दरम्यान, एफ अँड डी मधील या वादानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक वर्षांपासून काही विभागांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या सोयीनुसार काम करण्याची पद्धत रूढ झाल्याचा दावा काही नेटकरी करत आहेत. तुकाराम मुंढे यांनी शिस्तबद्ध कामकाजावर भर दिल्यामुळेच काही अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी त्यांच्या विरोधात तक्रार केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.